Sunday, January 22, 2012

रिक्षाचालकांची मुजोरी का traffic पोलिसांचा नाकर्तेपणा

ठाण्यात रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच करावा लागतो. म्हणजे इथे मी फक्त प्रवास करताना म्हटलंय, कुठल्या वाहनांनी करताय का पायी करताय हा प्रश्न गौण आहे. कारण कसाही प्रवास केलात तरी तुमच्या जीविताला धोका अटळ आहे. आता जगभर कुठेही अपघात होतातच, पण ते कशामुळे झाले ही गोष्ट महत्वाची आहे. रस्त्यावर अपघात होणं, हे जरी स्वाभाविक असलं, तरी अपघात का होतो चुकीमुळे होतो कि हलगर्जीपणामुळे होतो हे महत्वाचं आहे. उद्या जरका कोणी रस्त्याच्या मधून चालला असेल आणि कोणी ठोकलं तर चुकी मधे उभे राहणाऱ्याची. पण जर का कोणी रस्त्याच्या कडेनी चालत असेल आणि त्याला कोणी ठोकलं तर चूक कडेनी चालणाऱ्याची नक्कीच नाही. ज्यांनी ठोकलं त्यांनी का ठोकलं, त्यावेळी रस्त्यावरील बाकी dynamics कसे होते त्यावर जर का ते अवलंबून असेल तर ती चूक म्हणावी लागेल, पण जर का तो दारू पिऊन गाडी चालवत असेल आणि त्याचा गाडीवरील ताबा गेला तर तो गाडीवाल्याचा हलगर्जीपणाच म्हणावा लागेल. आता हा माणूस दारू प्यायला ज्या गुत्त्यावर गेला तिथेच जरका पोलीस गेला असेल, आणि त्याच्या समोर तो दारू पिऊन मग गाडी चालवायला बसत असेल तर मग तो पोलिसाचा नाकर्तेपणा म्हणावा लागेल.
या गोष्टीचा मला आजच अनुभव आला. आणि त्यावरून रिक्षावाले आणि पोलिसांचं साटं-लोटं आहे कि काय असा संशयही येतो. काल ऑफिस मधून संध्याकाळी घरी जाताना नेहमीप्रमाणे राम-मारुती रोडने येत होतो. नेहमीप्रमाणे रिक्षावाले उलट्या बाजूनी येत होते. त्यांच्यावर ओरडलो. पुढे आल्यावर कोपऱ्यावर एक पोलीस हवालदार दिसला बरेच दिवस मनात होतं, म्हणून त्याला विचारलं, काय हो राम-मारुती रोड अजूनही वन-वे आहे का? तो म्हणाला आहे. मी विचारलं मग तो रिक्षावाला तुम्ही इथे उभे असताना उलट दिशेनी कसा काय आला? त्यावर तो म्हणाला, साहेब असा अडवायचा प्रयत्न करणाऱ्या दोन हवालदारांना रिक्षावाल्यांनी आत्तापर्यंत उडवलय. रिक्षावाले, बाईकवाले जोरात येतात आणि पोलिसांना न जुमानता उलट्या दिशेनी निघून जातात. आमचा पगार तो किती, त्यात काय हात पाय मोडला तर त्याचा खर्च कसा काय करणार आणि घर कसं चालवणार. आपल्याला झेपेल तेवढा काम जीव सांभाळून करायचं बाकी सोडून द्यायचं. म्हणजे तसा काही अपघात वगैरे झाला तर त्याची तक्रार वगैरे आम्ही नोंदवून घेतो की. मी कपाळाला हात लावून घरी परत आलो. पण तेव्हा मला हे माहित नव्हतं की दुसऱ्याच दिवशी १२ तासांच्या आत तक्रार नोंदवण्याची पाळी माझ्याच मित्रावर येणार आहे.
काल रात्री ऑफिसहून घरी येताना माझं पोलिसाबरोबर बोलणं झालं आणि आज सकाळी ऑफिसला जाताना माझ्या मित्राचा अपघात झाला. एका उलट बाजूनी येणाऱ्या रिक्षावाल्यांनी त्याला राम-मारुती रोड वर ठोकलं. यात आता हलगर्जीपणा कोणाचा? रिक्षावाल्याचा? का पोलिसांचा? या अपघाताची जबाबदारी पोलीस घेणार काय? पोलिसाच जर काम असेल traffic regulate करणं आणि त्याकामात जर का तो नालायक ठरत असेल तर मग सामान्य नागरिकांनी बघायचं कोणाकडे. पोलीस जर का फक्त मूक निषेध नोंदवणाऱ्यावर लाठी हल्ला करून त्यात मर्दुमकी मानणार असतील तर मग पोलिसाला षंढच म्हणावं लागेल.
रिक्षावाल्यांची मुजोरी तर ठाण्यासाठी नवीन नाही. मीटरमध्ये फेरफार करणं, जवळची भाडी नाकारणं, रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभी करणं, रिक्षात तीनच्या ऐवजी चार प्रवासी घेणं या नित्याच्याच गोष्टी होत्या, ज्या ठाणेकरांनी आधीच accept केल्या होत्या. आता या रिक्षावाल्यांची मुजोरी एवढी वाढली आहे, की पोलिसांना पण ते जुमानत नाहीत. निदान माझ्या कालच्या पोलीसाबरोबरच्या बोलण्यावरून तरी तसेच म्हणावे लागेल. किंवा मग पोलीस नाकर्ते असचं म्हणावं लागेल. पोलीस नाकर्ते आधी का रिक्षावाले मुजोर आधी. कोंबडी आधी का अंडं?

Sunday, November 20, 2011

बासुंदी

दोन आठवड्यांपूर्वी "स्वाद" मध्ये दुपारचे जेवायला गेलो होतो. एकूण ब्राम्हणी पद्धतीचे जेवण मिळण्याचे ठाण्यातील स्वाद हे एक उत्तम थाळी restaurant आहे. जेवण मस्त होते. त्यामुळे मग ते आणखी उत्तम करण्यासाठी तिथल्या वेटरला विचारलं, गोड काय आहे म्हणून. तो म्हणाला, "श्रीखंडे, खरवसे, बासुंदीए." श्रीखंड दोन आठवड्यांपूर्वी चितळ्यांचं खाल्यामुळे नको म्हटलं , खरवसही गेल्याच रविवारी इथेच खाल्ल्यामुळे नको म्हटलं. म्हणजे इथे खरवस वाईट मिळतो असं नव्हे. म्हणजे in fact स्वादमध्ये मी आत्तापर्यंत खाल्लेला सर्वात चांगला खरवस होता. पण म्हणून दर वेळेला खरवस थोडीच खाणार. म्हणून मग बासुंदी आणायला सांगितली. पण कसचं काय... मी expect केलेलं कि मस्त सायटलेली घट्ट बासुंदी मिळेल म्हणून. पण छे. ही तर एकदम पातळ होती. माझा अगदीच विरस झाला. तसेच पैसे देऊन घरी आलो.

गेल्या आठवड्यात मित्राच्या लग्नाला गेलेलो. बघतो तर काय जेवायला सीताफळ बासुंदी. मी खुश. आधीच्या आठवड्यात चांगली बासुंदी खायला नाही मिळाली तर काय झालं. आता मस्त बासुंदी खायची. Buffet च्या रांगेत उभा राहिलो तेव्हाच एक वाटी बासुंदीसाठी रिझर्व ठेवली. सगळं घेतलं. एक चांगली उभं राहण्यासाठी जागा शोधली, चमचा बासुंदीच्या वाटीत घातला, चमच्याला काहीतरी घट्ट लागलं. मी आनंदलो. एक आठवड्यापासून जशी बासुंदी खायची होती तशी बासुंदी वाटत होती. एकदा चमचा ढवळून त्या घट्ट बासुंदीचा चमच्याला आस्वाद घेऊ दिला. मग चमचा ओतप्रोत भरला आणि तोंडात घातला. भ्रमनिरास. त्यात जे घट्ट दिसत होतं, ते सीताफळ होतं. बासुंदी तशीच काहीशी पातळ होती. चांगली बासुंदी खाण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली.

आज सकाळी आईचा फोन आला. तिला विचारलं कशी करायची बासुंदी ते. कृती तर खुपच सोपी वाटली. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची होती ती म्हणजे दुध उतू जाऊ द्यायचं नाही. बस... पण ती कृती प्रत्यक्षात येणं म्हणजे त्या कृतीला नचिकेत नामक एका आत्यंतिक आळशी माणसाच्या आळसाला शह द्यायचा होता. त्या कृतीला सुद्धा ते माहित होतं. म्हणून मग दुपारी तुडूंब जेवलो. येस बॉस मध्ये पान खाल्लं. आणि घरी येऊन रविवार दुपार जशी सत्कारणी लावायला हवी तशी लावली. २ तास मस्त झोप झाल्यावर उठलो. डोक्यात बासुंदी अजून ताजी होती. उठलो आणि दुध आणायला गेलो. दुध आणू आटवत ठेवले. सकाळी वाटलं त्याही पेक्षा सोपी वाटली कृती. १ लिटर दुधाची जेमतेम ३००-४०० ml बासुंदी केली. त्यात मस्त वेलची आणि केशर घातलं वरून बदाम किसून घातले. आणि इतके दिवस जी बासुंदी मी पीत होती... ती बासुंदी मी आज "खाल्ली". जीवाला धन्य वाटलं. पुन्हा असं काही वाटायची वाट बघत आता परत आळसाचं अधिराज्य पुन्हा चालू झालं.

Sunday, May 1, 2011

नाऱ्या

नारायण रोजच्या सारखा नऊ वाजले तरी उठला नव्हता. शाळेतून मास्तरांनी कधीच काढून टाकलेलं त्यामुळे सकाळी उठण्याची काहीच घाई नव्हती. आईनी पाठीत सोटा घातला आणि एक अर्वाच्य शिवी देऊन कमरेत लाथ घातली आणि नारायणाला उठवला. आज आपल्याला लवकर का उठवलं हा विचार करत नारायण डोळे चोळत चोळत उठला. आणि तोंडात ब्रश घालून डुलक्या घेत घेत गाईच्या शेपट्या पिरगळीत उभा होता. आईची नारायणाच्या मागे घाई चालूच होती. आता परत पाठीत एक दणका मिळेल कि काय या भीतीने नारायण पटापट आवरायला लागला. आंघोळ केली. मग आईनी त्याचा भांग पडला. आज आईचं हे असं का चाललय हे काही नार्याला अजून कळत नव्हतं. आईनी पण मग घरातलं आवरलं. नाऱ्याचा बाप शेतावर लवकर जात असल्यामुळे आईचा स्वयंपाक वगैरे नाऱ्या उठायच्या आधीच झाला होता. आईनी पण मग आपलं पण आवरलं, साडी वगैरे नीट केली आणि नाऱ्याला घेऊन चालायला लागली. नवीन शाळेत आज नाऱ्याचं नाव घालायचं होतं. नाऱ्या तसा हुशार होता. पण मस्ती करणे, अभ्यास न करणे, थापा मारणे अशा वाईट सवयीही नाऱ्याला होत्या. नवीन शाळेतील मास्तरांनी नाऱ्याचं नाव वगैरे नाऱ्याला विचारलं आणि शाळेत सातवीच्या वर्गात टाकलं. नाऱ्या मस्तीखोर आहे, मुलींच्या वेण्या ओढणे, मुलांना बदडणे, शिक्षकांच्या धोतरावर पेनातली शाई शिंपडणे असले नाऱ्याचे उद्योग आईनी आधीच मास्तरांना सांगितले होते. त्यामुळे मास्तरही सावध होते. मास्तरांनी दुसऱ्या दिवशी पासून नाऱ्याला शाळेत यायला सांगितले. नाऱ्याला आपल्याला आईने न सांगता शाळेत नेले आणि आपले नाव नोंदवले हे अजिबात पसंत पडले नव्हते. नाऱ्या पाय आपटतच घरापर्यंत आला. आणि घरी तर त्याने आकांड पांडवाच सुरु केले. पण आईनी पूर्ण तयारी केली होती. जेवायला आज नाऱ्याच्या आवडीचे श्रीखंड तयार होते. श्रीखंडाचे नाव काढल्यावर मात्र नाऱ्याने आपला राग आवरला आणि शांतपणे जेवायला बसला. पण अजूनही त्याच्या डोक्यात थोडा का होईना राग होताच. नाऱ्या तसा गप्प बसणाऱ्यातला तर नक्कीच नव्हता. पण समोर श्रीखंड पाहून नाऱ्या आधी राग आणि मग श्रीखंड गिळलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ची शाळा होती. त्यामुळे दमून आलेल्या बाबांशी थोड्या गप्पा मारून नाऱ्या लवकर झोपला. डोक्यात उद्याचे शाळेचे विचार होते. बराच वेळ नार्याला झोपच लागली नाही. आणि मग रात्री कधी झोप लागली ते कळलच नाही. सकाळी उठून नाऱ्यानी पटापट दात घासले. रात्री जागा असताना नाऱ्या शांत झोपला नव्हता. काहीतरी विचार करत होता. एकदा शाळेतून बाहेर काढलेलं असल्यामुळे अशी वेळ परत येऊ नये म्हणून काहीतरी प्लान त्याच्या डोक्यात शिजत होता. आणि म्हणूनच आज नाऱ्या पटापट आवरत होता. नाऱ्याला पटापट आवरताना आई बघत होती, आश्चर्य तर तिलाही वाटत होतं. पण आवरतोय ना चांगलं आहे, असं विचार करून तीही गप्पा बसली.
नाऱ्यानी सायकल वर टांग मारली आणि शाळेकडे जायला लागला. सायकल वरून जाताना पण मधेच कोणाला टपलीत काय मार, मधेच रस्त्यात निवांत आडव्या झोपलेल्या कुत्र्याचा अंगावर सायकल घाल आणि मग त्याला पिटाळूनच काय लाव असले उपद्व्याप चालूच होते. नाऱ्याचा आज सातवीच्या वर्गातला पहिला दिवस होता, मास्तरांनी नाऱ्याला आपली ओळख बाकी मुलांना करून द्यायला सांगितली. नाऱ्या रात्रभर याचाच तर विचार करत होता. नाऱ्यानी आपले नाव वगैरे सांगितलं आणि आपण खूप शक्तिवान असल्याचं पण आख्या वर्गाला सांगितलं. मास्तरांना ते खुपलं पण उगाच पहिल्या दिवशी बाहेर काढायला नको म्हणून ते पण गप्पा बसले. आणि त्यांनी पोरांना गणित शिकवायला घेतले.
नाऱ्याचा शाळेतला पहिला दिवस तर उत्तम गेला. हळू हळू नाऱ्यानी सगळ्या मुलांना आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. कुठे कोणाचं भांडण झालं तर ते सोडव, किंवा त्यात मध्यस्थी कर, किंवा मध्ये पडून दोघांना चोप दे. आधीच्या शाळेत बरेचदा नापास झाल्यामुळे नाऱ्या बाकीच्या मुलांपेक्षा वर्गात मोठा होता त्यामुळे बाकी मुलं पण नाऱ्याला मान द्यायची. एकदा मास्तरांनी मुलांना पेपर दिला आणि त्यांना विडी प्यायची लहर आली म्हणून त्यांनी नाऱ्याला वर्गावर लक्ष ठेवायला सांगितलं. मग नाऱ्या मास्तरांवर रोज लक्ष ठेऊ लागला. नाऱ्याला हळू हळू मास्तरांची विडी पिण्याची, दुसऱ्या एका मास्तरांची तपकीर ओढण्याची आणि हेडमास्तरांची मधेच दारू पिण्याची सवय कळली. जस जशा नाऱ्याला या सवयी काळात होत्या तस तशी नाऱ्याची शैक्षणिक प्रगती जोमाने (?) चालू झाली. नाऱ्याच्या या प्रगतीवर नाऱ्याचे आई बाबा, शेजारी पाजारी जाम खुश होते. नाऱ्यानी आता नाऱ्यानी शेजाऱ्यांची पण कामे सुरु केली.
नारायणाच्या गावात एक मोठा प्रश्न होता. गाव लहान पण लोक फार. आणि त्यातील बरेचसे म्हणजे जवळजवळ ७० टक्के शेतकरी. त्यामुळे नोटा बऱ्याच मळत. या मळलेल्या काळ्या नोटा कोणी घेत नसत. सरकारी कर वगैरे भरायला तर लोक अशा मळलेल्या फाटलेल्या काळ्या झालेल्या नोटा वापारु शकत नव्हते. सरकारी अधिकाऱ्याचं हातात नोट पडायची आणि तो ती खोटी म्हणून आपल्यालाच पकडायचा.... नाऱ्यानी ही गोष्ट ओळखली आणि नोटा धुवायला लागला. हळू हळू शेजाऱ्या पाजार्याना ही गोष्ट कळली. त्यांनी पण आपल्याकडे असलेल्या नोटा नाऱ्याकडे दिल्या. नाऱ्या प्रत्येक नोट वेगळी करायचा. आणि धुवायचा. नोटा जेव्हा मालकाकडे परत जायचा तेंव्हा त्याला त्या ओळखू पण येत नसत इतक्या स्वच्छ. आणि त्याही नीट बंडलात बांधलेल्या. नाऱ्याचं नाव मग हळू हळू गाव भर पसरलं. नाऱ्याचा मान खूप वाढला. लोक नाऱ्याला जादूगार समजू लागले. एवढ्या मळलेल्या नोटा इतक्या स्वच्छ... नाऱ्याची ही कीर्ती हळू हळू इतर गावांतही पसरली. नाऱ्याच्या हातात कलाच तशी होती. गावाचे सरपंच, पाटील, पोलीस अधिकारी सगळे नाऱ्याकडे नोटा धुवायला येऊ लागले. मग नाऱ्यानी आपला पूर्णवेळ व्यवसाय म्हणून हाच धंदा चालू केला. नाऱ्याची उठबस अशा मोठ्या लोकात व्हायला लागल्यामुळे नाऱ्या आता एक गावातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये गणला जाऊ लागला. कोणाला म्हैस घ्यायची असो किंवा गावातील कोणाचं लग्न असो, नाऱ्याला विचारल्याशिवाय काहीच होणं शक्य नव्हतं. या मोठ्या माणसांचे पैसे सांभाळणं हे ही नाऱ्यानी पुढे सुरु केलं आणि मग तर काय विचारता, नाऱ्या प्रतिष्ठित माणसांत पण मानाची जागा पटकावली. नाऱ्याला आता कोणी ‘नाऱ्या’ अशा एकेरी नावानी हाक मारत नव्हतं, तर ‘नारायणराव’ असं आदरानी संबोधत होतं.
तालुक्यात रस्ते कुठे कसे बांधायचे, धरणाचं पाणी कुठे अडवायचं, तिथल्या विस्थापितांनी कुठे जायचं अशा विषयात नाऱ्याचा शब्द आता अंतिम होता. नाऱ्या आता स्वतःला देवाचा अवतार म्हणवत होता. त्याचं कामच तसं होतं. तालुक्यात ५ शाळा, २ कॉलेजं, ३ हॉस्पिटलं, १ धरणं. नाऱ्याचं या मागचं धोरण एकाच होतं. जगात शांती आणि प्रेम नांदावं. सर्व राजकारण्यांशी, बिझनेसमनशी नाऱ्याचे चांगले संबंध होते. पण त्याचं हे असं वर वर चढणं काही लोकांच्या डोळ्यात खुपत होतं. मोठ्या माणसांचे शत्रू कमी थोडेच असतात. नाऱ्याच्या या मोठेपणावर काही लोक जळत होते. त्यातीलच स्वतःला समाजसुधारक म्हणवणारे लोक नाऱ्याच्या विरोधात प्रचार करू लागले. नाऱ्या लोकांना कसा फसवतो, तो जी जादू करतो त्याच्या पाठी विज्ञान कसं आहे हे पटवायचा प्रयत्न करत होते. नाऱ्याच्या भक्तांचा मात्र नाऱ्यावर पक्का विश्वास होता. कारण नाऱ्या हा देवाचा अवतार होता. देश विदेशातून नाऱ्याला देणग्या येत होत्या. आणि त्या देणग्यांमधून लोकांची सेवा करण्याचं नाऱ्याचं कार्य अव्याहतपणे चालू होतं आणि त्यातूनच अनेक भक्त नाऱ्याला मिळत होते. या कामाबरोबरच नाऱ्याचा नोटा धुण्याचा धंदा ही तेजीत चालू होता. आता तर नाऱ्या १८० देशांना नोटा धुवून देत होता. या सर्व देशांतून मग नाऱ्याला नोटा धुवायची कंत्राट मिळत गेली. तिथेही मग हळू हळू त्याचा भक्तगण वाढत गेला. आणि देणग्यांचा ओघ वाढत गेला आणि नाऱ्याच्या कार्याला आणखीन पुढे घेऊन गेला.
नाऱ्या आता म्हातारा व्हायला लागला होता. देवाचा अवतार असूनही आता त्याला व्हीलचेअरवरून जावं लागत होतं. बरचं काही करायची इच्छा होती, पण तब्येत साथ देत नव्हती. अनेक राजकारण्याचा, बिझनेसमनचा पैसा नाऱ्याकडे होता. अनेक नोटा धुण्याची कंत्राट घेतलेली होती. त्याचा हिशोब हे सगळं आता त्याचा मुलासारखा असलेला जितू बघत होता. नाऱ्या नंतर हे कार्य जितूकडून पुढे चालू राहणार म्हणून लोक जितूला नाऱ्याचा उत्तराधिकारी मानू लागले होते. पण अनेकांना जितूचं असं पुढे जनम रुचत नव्हतं.
नारायण आपलं काम आटपून भक्तांना भेटून झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी जितू नारायणाला उठवायला गेला तर काय नारायण सर्व भक्तांना सोडून आपले अवतार कार्य संपवून गेले होते. २ दिवसांनी नारायानावर अंत्यसंस्कार झाले. खरा प्रश्न मग बाहेर आला. अनेकांचे पैसे नारायणाकडे धुवायला आले होते. त्याचा हिशोब जितू कडे होता. पण या गोंधळात ती वही कुठे तरी गायब झालेली. आता मार्ग एकाच होता. प्रत्येकानी आपल्या नोटा ओळखायच्या आणि मग घेऊन जायच्या आणि दुसरीकडे धुवायला द्यायच्या किंवा जितू कडे त्या नोटा राहू द्यायच्या आणि मग धुतायला कि सगळ्या वेगळ्या करून ज्याच्या त्याला द्यायच्या. पण या मोठ्या लोकांचा नाऱ्यावर जेवढा विश्वास होता तितका विश्वास जितूवर नव्हता. त्यांनी जितूला नारायणाच्या खुनाचा कात केल्याच्या आरोपाखाली अडकवलं आणि आपण आपल्या नोटा ओळखण्यासाठी सर्व खजिना बाहेर काढला आणि आपल्या आणि थोड्या दुसऱ्याच्या ही नोटा घेऊन पसार झाले.

Tuesday, April 19, 2011

पुणे प्रवास

गेल्या आठवड्याच्या शेवटी पुण्याला जायचा योग आला... शुक्रवारी संध्याकाळी ठरवलं कि उद्या जायचं... गुरुवारी बँक हॉलिडे, आणि मग शनिवार रविवार त्यामुळे बरेच जण आधीच आधीच सुट्टीसाठी घरी किंवा बाहेर फिरायला गेलेले... जे गुरुवारी गेले नाहीत ते शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी जायला निघाले... माझा प्लान तसा उशीराच ठरल्यामुळे गाडीचं रिझर्वेशन मिळणं अशक्यच होतं. इंद्रायणी, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी सगळ्याचं गाड्या फुल होत्या... मग irctc ला log in केलं, एक मनमाड-पुणे गाडी दिसली... म्हटलं वेळ जास्त जाईल पण जायला तरी मिळेल... त्यातपण विचार केला कि कल्याणला बसायला जायच्या ऐवजी कर्जतला जाऊ, म्हणजे वेळ पण वाचेल... गाडी ८ वाजता कल्याणला आणि १० वाजता कर्जतला येते, म्हटलं ८ - ८:३० पर्यंत जरी निघालो तरी कर्जतला वेळेवर गाडी पकडू शकू... तिकीट काढायला ३० मिनिटे... म्हणजे ७:३०... म्हणजे घरातून निघायचं ७ – ७:१५ ला... असं विचार करून झोपलो.
सकाळी ६:१५ ला उठलो. आवरलं. सात वाजताच तयार झालो आणि निघालो... स्टेशन वर पोचलो तेव्हा ७:०५ वाजलेले... तिकीट काढायला काहीच रांग नव्हती... ७:१२ ला तिकीट हातात होतं... पफलाटावर गेलो तर इंटरसिटी जायची होती... सामान्य डब्याच्या जागी उभा राहिलो... म्हटलं बघू, मिळालं चढायला तर जाऊ याच गाडीनी... कशाला गाडी वगैरे बदलायची... ठाण्याहून कर्जत मग तिथून लोणावळा / पुणे... एकदमच जाता येईल. गाडी आली. गाडीत दुसरा किंवा तिसरा चढलो. बसायला वगैरे नाही मिळालं पण नीट उभं राहायला मिळालं. अजून काय हवा असतं एखाद्याला. गाणी भांडणं ऐकत प्रवास छान झाला.
१०:३० ला पुण्याला पोचलो. या वेळी ठरवलेलं कि रिक्षाला पाय लावायचा नाही. म्हणून बस डेपो शोधात फिरलो. अमितनी सांगितल्याप्रमाणे विजय सेल्स च्या मागे असलेल्या बस डेपो मध्ये गेलो. पाचेक मिनिटात संभाजी नगरची बस आली ती पकडली आणि घरी गेलो. घर वाकडेवाडीला असल्यामुळे जवळ पास खायाची काही दुकानं नाहीत... म्हणून सामान टाकलं आणि उदरभरणासाठी हॉटेलच्या शोधात निघालो... एव्हाना ११:३० झालेले... बस मधून उतरल्यावर निरा प्यायली असल्यामुळे अजून जिवंत होतो. निरा हे स्वास्थ्यवर्धक थंड पेय आहे, निरा रक्त आणि पचनशक्ती वाढवते, निरा मूत्राशय आणि पोटातील विकार दूर करते, निरा गर्भवती स्त्रियांना लाभदायक आहे, निरा उपवासाला चालते... असे नेहमीचेच बोर्ड वाचून धन्य वाटले. पुण्यात आलो कि निरा प्यायालीच पाहिजे. मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी निरा मिळते, पण मुंबईत पिणे होत नाही. पुण्यात होत इतकच. तर डेक्कनला जाणारी बस पकडली आणि गंधर्वमध्ये न्याहारीसाठी गेलो दुपारी १२ वाजता. न्याहारी आणि जेवण एकदमच केलं. तिथून माळवाडीची बस पकडली आणि कोथरुडला गेलो. तिकडचं काम उरकलं आणि दीड – पावणे दोनच्या सुमारास मोकळा झालो. आता प्रश्न होता काय करावे हा. उकडत तर जाम होतं मग स्वातंत्र्य चौकापासून ते सिटी प्राईड कोथरूडला गेलो. thank you आणि फालतू अशा दोन चित्रपटांचा पर्याय होते. मी thank you निवडला. शो सुरु व्हायला अजून तास होता. बाहेर एकट्यानी उन्हात थांबून काय करणार म्हणून आत गेलो. आतला ए सी चांगला होता. बसायला जागा पण छान होती. एक मस्त गुबगुबीत सोफा. एकदम ICICI BKC च्या लायब्ररीतील सोफा आठवला आणि त्याचा योग्य (?) उपयोग करणारे आठवले आणि त्या सोफ्यावर बसलो. गुबगुबीत सोफा. गार ए सी ची हवा. जेवण छान झालेलं. उन्हातून दीड एक किलोमीटर चालणं झालेलं. आणि पिक्चर सुरु व्हयला अजून तास. सकाळी निघायचं त्यामुळे उठलेला लवकर. सोफ्यावर बसलो आणि काय... त्या सोफ्याच अत्यंत योग्य असा उपयोग झाला. की मस्त झोप लागली. अहाहा... शांत... पिक्चर बघायला एकदम ताजातवाना झालो... १६० रुपये वसूल करायचे होते... त्यातले काही त्या सोफ्यानी करून दिले. आता आत जायचं आणि मस्त पिक्चर बघायचा. ‘Thank You’. आत गेलो. अजून राष्ट्रगीत चालू व्हायचं होतं. जाहिराती झाल्या आणि राष्ट्रगीत चालू झालं. राष्ट्रगीताचा इथला video चांगला आहे. सैन्याच्या बिगुलवर (बिगुलच बहुतेक तरी) राष्ट्रगीत वाजता आणि समोर बर्फाळ हिमालयात आपले सैनिक राष्ट्रगीतसाठी सावधान उभे आहेत. राष्ट्रगीत संपलं. आणि पिक्चर सुरु झाला. सुनील शेट्टी, अक्षय कुमार, सोनम कपूर, धर्मेंद्रचा कोण तो मुलगा आणि हो तो इरफान खान (तोच थोडा बेअरेबल आहे) आणि २-३-४-५ बायका. पहिल्या १० मिनिटात कळलं कि पिक्चरला येऊन चूक केली. पण आपण पडलो चुकांना दुसरा चान्स देणारे. वाटलं थोड्या वेळानी चित्रपट काहीतरी कलाटणी घेईल. आता घेईल मग घेईल. पण छे. सगळा वेळ तसाच थंड, रटाळ असा तो पिक्चर कसा तरी मध्यंतरापर्यंत आला. थेटर मधले सगळेच कंटाळलेले दिसत होते. पिक्चरला नाव ठेवत होते. मी एकटाच होतो, त्यामुळे मीही मनातल्यामनात पिक्चरला आणि मग मी ‘हाच’ पिक्चर का बघायला आलो म्हणून स्वतःला नावं ठेवली. मध्यांतर संपला. आणि पुढचा रटाळ आणि उत्तरोत्तर अधिकच कंटाळवाणा होत गेलेला पिक्चर पहिला. घर जवळ असतं आणि उकाडा कमी असता तर मी नक्कीच घरी जाणं पसंत केलं असतं. नक्कीच शंकाच नाही. कोण त्या सुनील शेट्टीचा अभिनय (?) पाहणार.
बाहेर पडलो. उन कमी झालं होतं. थोडसं ढगाळ वातावरण होतं. वाटत होता पाऊस येणार बहुतेक. असं विचार मनात येतो ना येतो तोच पावसाचे मोठ्ठे मोठ्ठे थेंब पडायला लागले. तरी पुणेकर शांत होते. कुठे धावपळ नाही. कुठे घाई नाही. मलाच कसातरी व्हायला लागलं. पाऊस मोठा आला तर जवळ आसरा शोधात शोधात जात होतो. रिक्षा तर करायची नव्हती. आणि बस कुठे थांबेल माहित नव्हतं. तसाच चालत राहिलो. मातीचा मस्त वास सुटला होता. एकदम फ्रेश वाटलं. पिक्चर बघितल्याचा सगळा शीण क्षणार्धात नाहीसा झाला. वाटलं चालतच राहावं. चालाताच राहावं. म्हणून चालतच डेक्कन कडे कूच केलं. सिटी प्राईड ते डेक्कन हे अंतर तसं काही जवळ नाही. चालत जायला तर मुळीच नाही. तीन एक किलोमीटर तरी नक्कीच असेल. मधेच पाऊस थोडा मोठा झालं म्हणून आडोशाला थांबलो. आणि मग परत पुढे चालू लागलो.
चालताना विचार आला, पुण्यातले रस्ते किती रुंद आहेत. फुटपाथ पण रुंद आहेत आणि चालायच्या लायकीचे पण आहेत. इतकेच नव्हे तर पुणेकर त्या फुटपाथवर चालत पण आहेत. फारच थोड्या दुकानांनी फुटपाथवर अतिक्रमण केलय. बरं वाटलं. मध्ये एका ठिकाणी उसाचा रास प्यायलो. FC रोड ला सब वे झालय मन मित् च्या बाजूला तिथे नाश्ता कम रात्रीचं जेवण असं एकदम केलं. अन पुढच्या प्रवासला लागलो. अजून जवळपास दोन अडीच किलोमीटर जायचं होतं. पण गेलो. पाय दुखायला लागले होते. म्हणून घरातली कामं आटपून लवकर झोपलो. उद्या दुपारी निघायचा विचार होता. आरामात उठून निघायचं. दिवस भर झालेली दमणूक, त्यामुळे दुखत असलेले पाय. यामुळे झोप छान लागली.
सकाळी ६ ला एकदम जाग आली. एकदम फ्रेश वाटत होतं. हवेल किंचितसा गारवा होता. पंखा बंद असला तरी चालत होता. तसाच उठलो आणि आवरलं. आणि परत काहीतरी टाईम पास करण्यापेक्षा आत्ताच निघायचं नक्की केलं. घर बंद केलं. आणि स्वारगेटला आलो. अजून रविवारची परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी सुरु व्हायची होती. पुणे-ठाणे-वसई गाडी मिळाली. मस्त विंडो सीट मिळाली. मस्त डुलक्या देत घरी आली. डुलक्या कसल्या झोपा काढत हा शब्दप्रयोग जास्त योग्य आहे मी जसा आलो त्याला.
एका दिवसाचा प्रवास छान झाला. नेहमी स्वतःच्या वाहनाने जाणारा मी आज पब्लिक ट्रान्सपोर्टनी गेलो. बरं वाटलं. नेहमीपेक्षा श्रम जास्त झाले, पण खर्च ही कमी झाला. नेहमी फिरायला जाताना स्वतःचे वाहन नसले तरी तेवढीच मजा येते हे कळलं. आणि मधून मधून असं ही प्रवास करायला हवा ही जाणीव झाली. पुढचा असा प्रवास कधी करीन माहित नाही पण नक्की करीन हे नक्की झालं.

Friday, March 18, 2011

च्यामारी...

करलो दुनिया मुट्ठी मे, लाथ मारीन तिथे पाणी काढीन, म्हणणारे आपण निसर्ग जेंव्हा लाथ मारतो तेंव्हा कुठे असतो ते बघायला आपण शिल्लक जरी राहिलो तरी खूप झालं... जपानवर आलेलं संकट हे याचचं द्योतक आहे... आपण २० व्या शतकातून २१ व्या शतकात गेलो... विज्ञानानी खूप प्रगती केली... आपण चंद्रावर पोचलो... चंद्रावर पाणी आहे का नाही ते पाहिलं, मंगळावर गेलो, जगाची उत्पत्ती कशी झाली असावी हे शोधण्यासाठी बरेच अवाढव्य आणि खर्चिक प्रयोग केले... नॅनो टेक्नोलॉजी, बायो टेक्नोलॉजी.... किती तरी शिखरं पार केली... पण जेंव्हा निसर्ग काही शिखरं पार करतो... तेंव्हा आपल्याकडे त्याचाशी लढण्यासाठी हत्यार तर दूर... स्वतःला वाचवायला निवारा शोधायला हि वेळ मिळत नाही. जपानमधील सुनामीमध्ये झालेल्या नुकसानाचे फोटो पाहताना तर हे अगदी प्रकर्षानी जाणवतं. वाहून गेलेलं सामान, गाड्या, विमानं, इतकाच न्हवे तर वाहून गेलेली घरं... च्यामारी... मी घर धुतात हे ऐकलेलं पण घरासकट कोणी गावच्या गाव धुवून नेलेलं मी तरी प्रथमच ऐकलं आणि पहिलं... मागे जहाजांच्या टक्करीत कंटेनर समुद्रात वाहून गेलेले वाचले होते. पण इथे तर रेल्वेच्या रेल्वे वाहून गेल्या आणि जहाजांची तर समुद्रानी काहीच लाज शिल्लक ठेवली नाही... इथे तर आभाळच फाटलं होतं तर टाका तरी कुठे कुठे म्हणून घालणार हो...

त्यानंतर आलेलं संकट तर त्याहूनही अधिक भयानक आणि उग्र होत... ते म्हणजे अणुभट्टीत झालेले स्फोट... अनेक भूकंपाचे धक्के तर रोजच्या जीवनाचा भाग झालेल्या जपानने हिरोशिमा आणि नागासाकीही पचवले... त्यातून शिकलेल्या अनेक धड्यांमुळेच बहुधा जीवित हानी कमी झाली असावी... पण तरीही पुन्हा एकदा रेडीएशनचा त्रास या देशाला तरी द्यायला नको होता... आधीच कूर्मगतीने होणारा जपानचा आर्थिक विकासाचा दर... आणि त्यात हा दर आणखी कमी करणार असलेलं हे संकट म्हणजे जपानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक आव्हान असणार आहे... जपान वाढत नसला तरी ती एक मोठी बाजारपेठ होती... एक उत्पादनाची जागा होती... बंद पडलेली अणुभट्टी... उर्जेची कमतरता... कमी झालेली मागणी... अशा एक दुष्ट चक्रात जपान जगाला घेऊन गेलाय... भूमध्य सागरी क्षेत्रात असलेली आणीबाणीची स्थिती, इजिप्त, ट्युनिशिया, बहारीन मध्ये असलेली नाजूक स्थिती.... जागतिक विकासाच्या समोर एक आर्थिक आव्हान आहे... भारतातील स्थितीसुद्धा काही फार चांगली म्हणावी अशी नाहीये... महागाईचा दर अजूनही वरच आहे... त्यावर चाप बसवायचा म्हणून रिजर्व बँकेने वाढवलेले व्याजाचे दर... त्यामुळे कमी झालेला विकासाचा दर... संकटांची मालिकाच आहे... त्यातच दर पंधरवड्याला बाहेर येणारे घोटाळे... आणि मग त्यावर चालू असलेली किळसवाणी चर्चा... घोटाळे राहिले बाजूला... हा घोटाळा झाला तेंव्हा दुसरा पक्ष कसा सत्तेवर होता आणि त्यांच्याच काळात हा घोटाळा कसा झाला आणि आम्ही असताना कसा फक्त बाहेर आला अशा बतावण्या... डोकं सुन्न होतं... च्यामारी...

Tuesday, March 23, 2010

आजचा संस्मरणीय सायकल प्रवास


आदल्या रात्रीच ठरवून ठेवलेलं कि बस आज नक्की ठाण्याहून दादरला जायचं. गेल्या वेळेला पवईला गेलो होतो, त्या आधी घाटकोपरला जाऊन आलेलो. त्यामुळे या वेळी नक्की केलेलं कि आज दादरवर स्वारी... रात्री आईला सांगितलं, उद्या उशीर होईल... दादरला जाणार आहे... एव्हाना आईने सांगणं सोडून दिलेलं. हा काही ऐकणार नाही... कितीही सांगितलं तरी... रात्री लवकरच झोपलो साडे अकराला. निर्धार पक्का होता. उद्या सकाळी लवकर उठायचं पाच वाजता आणि साडे पाच पर्यंत निघायचं... मोबाईलवर गजर लावला पाचाचा आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी जास्त श्रम करायचे असतील तर पिष्टमय पदार्थ खावेत असं अनेक ब्लॉग्स वर वाचलेलं. त्यामुळे रात्री कधी नव्हे तो भात खाल्ला. सकाळी बरोबर पाचाला गजर झाला.. डोळ्यावर झोप कायम होती. म्हणून स्नूझ करून परत झोपलो. नऊ मिनिटांनी परत गजर झाला. या वेळेला उठलो. सकाळची आन्हिक उरकली आणि पावणे सहाला निघालो. थोडा warm up केला आणि सायकलवर स्वर झालो.
हवेत थोडासा गारवा होतं. सूर्य अजून उगवायचा होता. इतकाच काय दुधवाले, पेपरवाले यांना पण अजून जाग यायची होती. रस्त्यावर वर्दळ अशी नव्हतीच. कोणीतरी एखादा रिक्षावाला फुर्रर्र करत जात होता. पूर्व द्रुतगती मार्गाला लागलो. इथे मात्र चांगल्या पैकी वर्दळ होती. रात्री कुठून कुठून निघालेले ट्रक, टेम्पो, दुधाचे टँकर आपआपल्या स्थळी जाण्यासाठी धावत होती. मी पण दादर कडे कूच केलं. प्रत्येक पॅडल बरोबर निर्धार पक्का होत होता. या आधी सर्वाधिक ३० कि.मी. गेलेलो. पण आज जवळजवळ ५० कि.मी. चं उद्दिष्ट होतं. पुढे पुढे चाललो होतो... ठाण्याची हद्द संपली. मुलुंडचा चेक नाका मागे गेला. मुलुंड चा सिग्नल, भांडूप पंपिंग स्टेशन गेलं. अंधार अजूनही कायम होता. पुढे तर रस्त्यावर दिवे सुद्धा नव्हते. पूर्ण अंधार. मागून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात चालवत होतो. रस्त्यावर खड्डे नसल्यामुळे फारशी काळजी नव्हती. एक बैलगाडी वाटेत भेटली. सर्योदयापूर्वी जेवढे अंतर कापता येईल तितके चांगले असा त्याचाही उद्देश असावा. पुढे जातच होतो.
माझा ताशी वेग साधारण २० - २५कि.मी./तास असावा. पवईचा सिग्नल गेला. आता हळू हळू उजाडू लागलं होतं. माझ्यासारखेच अनेक उत्साही morning walk करायला निघालेले. कोणी नमस्कार घालत होतं, कोणी हात हलवत होते, कोणी मोठ्या निर्धाराने वजन कमी करण्यासाठी brisk walk घेत होते. विक्रोळीला गोदरेजच्या पुढे आलो. ३-४ मुलं पाठीवर बॅगा घेऊन ट्रेक ला वगैरे जायच्या तयारीत निघाले होते. एकूण काय गुढी पाडव्याची सुट्टी सगळे (माझ्यासारखेच) सत्कारणी लावत होते.
घाटकोपर डेपोचा फाटा आल. गेल्यावेळी इथपर्यंत आलेलो. तेंव्हा घरी पोचल्यावर वाटलेला कि अजून पुढे गेलो तरी चालल असत. या वेळी मात्र पक्कं होतं. दादर खोदादाद सर्कल पर्यंत जायचं. अजून १०-१५ कि.मी. चा रस्ता होता. मध्ये सायन वगैरे लागणार होतं. बाईक वरून पण दादर ला फारसा गेलो नव्हतो. ऑफिस बी के सी ला होतं त्यामुळे सायन वरूनच परत फिरायचो. आज मात्र पक्कं होतं. दादर. एव्हाना रमाबाई आंबेडकर नगर जात होतं. मागच्या टायर मध्ये हवा कमी आहे कि काय असं वाटला म्हणून थांबलो आणि टायरला हात लावून बघितला. हाय... टायर पंक्चर झाला होता. एव्हाना फक्त साडे सहाच वाजले होते. जवळच एक चहा वाला होता. तिथे थोडी गर्दी होती म्हणून तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं घाटकोपर मध्ये कदाचित मिळेल पंक्चर वाला. सायकल वरून उतरून चालणं भाग होतं. चालायला लागलो. आणि खिसा चाचपला. १०० रुपयाची एक नोट होती. बाईक च्या एका पंक्चर ला ४० रुपये घेतात हे ठाऊक होतं. विचार केला सायकल ला २० रुपये घेतले तरी पाच पंक्चर असली तरी काढता येतील. फक्त पंक्चर काढणारा मिळायला हवा होता. घाटकोपर मध्ये थोडा हिंडलो एक दोन पंक्चर वाल्यांची दुकानं दिसली पण सकाळी सात वाजता ते थोडीच उघडणार होते दुकान. रस्त्यात एका दुधवाल्याला विचारलं, त्यांनी एक सायकल वाला सांगितला जो सकाळी सात वाजता उघडतो. अजून ते दुकान उघडायचं होतं. थोडा वेळ तिथेच रेंगाळलो. मागच्या बिल्डींग मधून एक गुजराती नवरा-बायको बाहेर आले. बहुदा मॉर्निंग वॉक घ्यायला चालले असावेत. त्यांना हटकलं तेव्हा त्यांनी कुठल्याश्या गणपती मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पंक्चर वाला आहे असा सांगितलं आणि त्याच दिशेनी पुढे गेले. मी हि माझी मार्गक्रमणा चालू केली. जेमतेम २ मिनिटं झाली असतील, तर तेवढ्यात एक गाडी उलट्या दिशेनी आली, तेच गुजराती नवरा बायको होते... त्यांनी confirm केलं कि इथे दोन मिनिटांवर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला एक पंक्चरवाला चालू आहे. त्यांचे आभार मानले आणि तसाच त्या पंक्चरवाल्याकडे गेलो. वेळ साधारण ६:५०. त्याच्या जवळ पोचलो आणि त्याला सांगितलं पंक्चर काढायला. त्यानी साफ नकार दिला. तो म्हणाला कि तो फक्त बाईकचे आणि कारचे पंक्चर काढतो. त्याची बरीच मिनतवारी केली पण छे, तो काही मानायला तयार नव्हता. शेवटी उठलो. एव्हाना सात पण वाजलेले, म्हटलं बघूया त्या मागच्या सायकलवाल्याकडे उघडला असेल तर... नाहीतर थांबू... सातचा सव्वा सात पर्यंत तरी येईलच की. पण तो वेळेचा पक्का होता. त्याच्या कडे साकडं घातलं. पण तो काही नवसाला पावणारा नव्हता. त्याचाकाडचा पंक्चर काढणारा आला नव्हता. तो यायचा होता नऊ वाजता. मग काय धोंडो भिकाजी जोशींनी पार्ल्याचा मावशीचं बंद घर शोधलं तशी बरीच बंद पंक्चरची दुकानं मी घाटकोपर मध्ये शोधली. मधे मधे अनेक दुधवाले, सायकल चालवणारी मुले यांची बंद दुकानं शोधायला मदत मिळाली.
एव्हाना साडे आठ वाजले होते. सकाळी खाल्लेला भात कुठच्या कुठे गेला होता. पोटात कावळ्याच्या शाळेत मधली सुट्टी झाली असल्यामुळे त्यानी कल्लोळ मांडला होता. मधे मधे आता रस्त्यावरून जाताना बरेच खायचे joints लागत होते. पण खिशात फक्त शंभर रुपये होते. ट्यूब बदलावी लागली तर किती खर्च येईल याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे पंक्चर वाला मिळण्याची वात पाहत होतो. परत त्या मागच्या पंक्चरवाल्याकडे परतलो, त्याचा तो पंक्चरवाला नवाला आला. त्यानी टायर उघडला, त्या ट्यूब मध्ये एकाच पंक्चर होतं, माझ्या खिशात नव्वद रुपये बाकी ठेऊन मी क्षुधा शांती साठी शोध घ्यायला चालू केला.
घाटकोपर स्टेशन जवळ एका कोपारयाशी एक इडलीवाला भेटला, त्याचाकडे तीन-चार इडल्या खाल्ल्या आणि परतीच्या प्रवासाला लागलो. पंतनगर मधून घाटकोपर डेपोमार्गे परत हायवेला लागलो. एव्हाना सूर्य बराच वर आला होता. जवळजवळ साडे नऊ वाजले असतील. परत rhythm आला. झप झप पॅडल मारू लागलो. विक्रोळी चा सिग्नल गेला. परत एकदा हवा कमी झाल्ये की काय अशी शंका आली म्हणून हात लावून पहिला तर शंका खरी ठरली. मागचा टायर पुन्हा एकदा पंक्चर झाला होता. पाण्याचा एक घोट घेतला आणि पुन्हा एकदा पंक्चरच्या दुकानाचा शोध चालू झाला. नशिबानं लवकरच एक पंक्चरचं दुकान मिळाला आणि साधारण १५ मिनिटात परत प्रवास चालू झाला. शेवटी साडे दहाला खिशात ६४ रुपये, बाटलीत पाव लिटर पाणी, भिजलेला टी-शर्ट आणि पोटात प्रचंड भूक घेऊन घरी आलो.
प्रवास चालू केला तेव्हा ठरवलं होता दादरला जायचं. दादरला तर नाही जाऊ शकलो, पण या प्रवासानी एक आत्मविश्वास दिला की, मी दादरपर्यंत जाऊन परत नक्की येऊ शकीन, कदाचित न थांबताही.